पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सक्ख्या भावांचा मृत्यू; आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। नंदुरबार मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा येथील धरणात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सक्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेतात फिरण्यासाठी गेले असताना त्यांना धरणातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. तेथील रहिवाशांनी त्यांना तत्काळ बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आर्यन गोरख वळवी , प्रीतम गोरख वळवी असे मृत सख्या भावांची नावे आहेत.

या घटनेची माहिती गावात पसरली आणि मृतांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दोघ सक्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वळवी परिवारातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात खांडबारा पोलीस पुढील तपास करीत आहे.