‘पुन्हा एकदा मोदी सरकार’

भारतीय जनता पक्षाच्या राज्यव्यापी महाविजय २०२४ अभियानांतर्गत गेल्या दोन महिन्यांत २१ लोकसभा क्षेत्रात दौरा करताना ३३हजार ६९७ नागरिकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पसंती दिल्याने ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ हे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्र भाजप कटिबद्ध आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. या २१ लोकसभा प्रवासाचा विस्तृत गोषवारा देणारी एक पोस्ट बावनकुळे यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे. बावनकुळे यांचा सद्या ‘मिशन 45+’साठी राज्यव्यापी दौरा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी माहिती दिली आहे.

बावनकुळे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले, “आतापर्यंत २१ लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला. या प्रवासात ३३ हजार ७१० नागरिकांशी थेट संवाद साधला असून, पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण आवडेल? असा प्रश्न विचारला. त्यापैकी ३३ हजार ६९७ लोकांनी पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांना प्राधान्य दिले. तर इतर पक्षांच्या नेत्यांना केवळ १३ जणांनी पसंती दिली. त्यापैकी फक्त ४ राहूल गांधी समर्थक होते.”

ते म्हणाले की, “गेल्या साडेनऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासामुळे, संपूर्ण जगात भारताचा गौरव केला. स्वावलंबी भारताची शपथ घेऊन, महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा मोदीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या या प्रेमाच्या जोरावरच लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील, असा विश्वास आहे. ‘पुन्हा एकदा मोदी सरकार’ हे ध्येय साध्य करण्यासाठी महाराष्ट्र भाजप कटिबद्ध आहे,” असा दावाही बावनकुळेंनी केला आहे.