पेपर अवघड गेला, १२ वीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; जळगाव जिल्ह्यातील घटना

भुसावळ : भुसावळ शहरातील समृद्धी पार्क येथे राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली. दरम्यान, सध्या बारावीचे पेपर सुरू असून, इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने या विद्यार्थ्याने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. इदांत पंकज मंडलेचा (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

भुसावळ शहरातील समृद्धी पार्क येथे वास्तव्यास असलेला इदांत यंदा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. यामध्ये इदांत मंडलेचा याने काही दिवसांपूर्वी बारावीचा पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर दिला होता. परंतु हा पेपर त्याला अवघड गेल्याने तेव्हापासून तो नैराश्यात होता.

दरम्यान, २७ फेब्रुवारीला इदांत याने घरी कोणी नसताना पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. या घटनेबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस कर्मचारी गणेश चौधरी तपास करीत आहेत.