प्रतीक्षा संपली : उद्या वाजणार लोकसभा निवडणुकीचा बिगुल

नवी दिल्ली | बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे.निवडणूक आयोगाने (ECI) दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद बोलावली असून यावेळी  निवडणूक अयोग्य लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या बैठकीत नव्याने नियुक्त झालेले निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते.  या बैठकीत  लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांबाबत निर्णय घेण्यात आला.

आता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी शनिवारी 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे.

महाराष्ट्रात किती टप्प्यात निवडणूक
लोकसभेच्या निवडणुका सात ते आठ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून उद्या १६ मार्च रोजी पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकांसोबत ओडिशा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.