प्रेमविवाह : अवघ्या 3 महिन्यातच तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

औरंगाबाद : औरंगाबादमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या ३ महिन्यातच तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवार (दि.३०) दुपारी २ वाजेच्या सुमारास बजाजनगरात येथे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सूत्रानुसार, तरुणीच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. घराला हाथबार लागावा त्यामुळे ती एका कोचिंग क्लासेसमध्ये नोकरी करत होती. तिथे तिची एका तरुणाशी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी घरच्यांचा विरोध होईल म्हणून ९ नोव्हेंबर २०२२ रोजी आळंदी येथे पळून जाऊन लग्न केले. मात्र, तीन महिन्यातच दोघांमध्ये वाद सुरु झाले आणि त्यातून तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तरुणीने पती व सासरच्या मंडळी विरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी दोघांसह त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन केले. मात्र, समुपदेशानंतर तरुणी ही सासरी न जाता बजाजनगरात आईकडे गेली होती सोमवारी सकाळी आई कामासाठी बाहेर गेल्याने तरुणी घरी एकटीच होती. कामाला गेल्यानंतर आई तरुणीच्या मोबाईलवर सतत संपर्क करत होती मात्र तरुणी प्रतिसाद देत नव्हती. अखेर त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी घरात डोकावून पहिले असता तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आली.

दरम्यान, तरुणीच्या आईने तिला सासरचलचा त्रास असल्याचा आरोप केला आहे तसेच कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.