बारागाड्यांचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह न्यूज : कासोदा/एरंडोल : खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवात बारागाड्यांचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तळई, ता. एरंडोल येथे 29 रोजी मध्यरात्री घडली. राहुल पंडित पाटील (वय 29, रा. निपाणे, ता. एरंडोल) असे मयताचे नाव आहे. एका पाठोपाठ शेवटच्या पाच गाड्यांची चाके त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या या युवकाचा उपचार घेताना मृत्यू झाला.

चंपाषष्ठीनिमित्त तळई येेथे खंडेराव महाराजांची यात्रा 29 रोजी सायंकाळी भरली होती. सायंकाळी पाचला ध्वज काठीची धनगर मढीपासून विधीवत पूजा करून भगत समाधान भगवान पाटील यांच्यासह इतर नागरिकांनी बारागाड्या ओढण्यास सुरुवात केली. बारागाड्यांच्या बाजूला असलेल्या चाकांकडून इतर युवक व नागरिक हे या बारागाड्यांना पुढे ढकलत होते.

बारागाड्यांना पुढे ढकलत असताना राहुल पंडित पाटील, गोपाल संजय पाटील, महेंद्र समाधान वारुळे हे युवकसुद्धा बारागाड्या लोटत होते. बारागाड्या लोटत असताना राहुल पंडित पाटील (वय 29) युवकाचा पायात पाय अडकल्याने तो खाली पडला. त्याच्या मागे धावत असलेले गोपाल पाटील व महेंद्र वारुळे हेसुद्धा खाली पडले. या दुर्घटनेत शेवटच्या पाच गाड्यांचे चाक राहुल पंडित पाटील या युवकाच्या पोटावरून, पायावरून निघाले, तर गोपाल संजय पाटील व महेंद्र समाधान वारुळे या युवकांच्या पायावरून बैलगाडीचे चाके गेल्यामुळे दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले. राहुल पंडित पाटील हा युवक जबर जखमी झाला. यामुळे त्यास तत्काळ एरंडोल येथे खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास तपासले. या रुग्णाची तब्येत गंभीर असल्यामुळे त्यास जळगाव येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी त्यास तत्काळ जळगाव येथे हलवले. उशिरा रात्री एक वाजेच्या सुमारास राहुलचा मृत्यू झाला.

मयत राहुल पाटील जिल्हा बँकेच्या निपाणे शाखेत रोखपाल म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्र्चात आजी, आई, वडील, लहान भाऊ, पत्नी अश्विनी व 11 महिन्याचा मुलगा रुद्र असा परिवार आहे.

जखमी असलेला गोपाल संजय पाटील (रा. जोगलखेडा, ता.पारोळा) हा आपल्या बहिणीकडे तळई येथे यात्रा पाहण्यासाठी आलेला होता, तर दुसरा जखमी महेंद्र समाधान वारुळे (वय 21) हा तळई येथील रहिवासी आहे. या दोन्ही युवकांचे पाय फ्रॅक्चर झाले आहे.

मयत राहुल पाटील याच्यावर दुपारी तळई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल हा अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करीत बँकेत नोकरीला लागला होता. बर्‍याच वर्षानंतर आता कुठे त्यांना सुखाचे दिवस आले होते. मात्र त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.