बारीपाड्याचे चैत्राम पवार यांना ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’

धुळे : साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 20 लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचा वन विभागाकडून गौरव आला आहे. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात 3 मार्च रोजी हा पूरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे.

साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा आदिवासीपाडा आहे. या पाड्याची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी होती. 1992 नंतर हे चित्र पालटलं आहे.

गावात मोठया उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले. त्यांना गावातल्या आदिवासी मावळ्यांनी साथ दिली. या लोक चळवळीची दखल जगाने घेतली. जगातील 78 देशांमध्ये चांगले गाव कसे असावे? याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने द्वितीय क्रमांक पटकावलाय.

त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. चैत्राम पवार आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून दैदिप्यमान बारीपाडा या आदिवासी पाड्याची यशोगाथा आहे.