बीडमध्ये हिंसाचाराने झालेली राख पाहून काय म्हणाले छगन भुजबळ?

बीड : गेल्या आठवड्यात बीडमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी हिंसाचारानंतरच्या परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांशी चर्चा करून हिंसाचाराची माहिती घेतली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?
या प्रकरणाची योग्य ती चौकशी करा आणि कोणाचेही गुन्हे मागे घेऊ नका, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांनी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना सरकारवरही तोफ डागली आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवल्यानंतर मला ज्यावेळी ही घटना समजली त्यावेळी सुभाष राऊत हे माझ्यासोबत मंत्रालयात होते. त्याचवेळी मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून कल्पना दिली होती.

सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर दगडफेक होऊ शकते, असं मी पोलीस अधीक्षकांना चार तास आधी सांगितलं होतं. त्यानंतर चार तासाने हा प्रकार घडला, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.

चार तास वेळ मिळून देखील राऊत यांच्या हॉटेलला पोलीस बंदोबस्त देण्यात आला नव्हता. यातच पोलिसांचे अपयश दिसते. याबरोबरच पोलिसांचा गुप्त वार्ता विभाग ही या प्रकाराची माहिती देऊ शकला नाही. हे अपयश आहे.

यात एसआयटी असो की न्यायालयीन चौकशी… काय करायचे ते करा. पण चौकशी करा. या हिंसाचारातील गुन्हे देखील मागे घेऊ नका, असं म्हणत सरकारवरच भुजबळांनी तोफ डागली.

बीड हिंसाचार हा सरकार आणि गृहमंत्रालयाचं अपयश आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर तुम्हीच काय ते ठरवा, असं ते म्हणाले.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला. मराठा समाजाला ओबसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण दिल्याने ओबीसींवर अन्याय होणार आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय.