बुलढाण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक ; तीन तरुण ठार, जळगावातील दोघांचा समावेश

बुलढाणा/जळगाव । राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यात अनेकांचा जीव जात  आहे. अशातच ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक देऊन भीषण अपघात झाला आहे. यात तीन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वडनेर गावाजवळ घडली. दरम्यान, मृत तरुणांमध्ये दोन तरुण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते.

काय आहे घटना?

वडनेर गावाजवळ दि.१५ नोव्हेबर बुधवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर तीन तरुण दुचाकीवरून जात असतांना त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात जळगाव जिल्ह्यातील स्वप्निल करणकार (वय २७) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष) तर कल्याण येथील आकाश राजू आखाडे अशी मयत तरुणांची नावे आहेत. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन भाऊबीजीच्या दिवशी ३ तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.