ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन्.. ; चाळीसगावच्या एसटीचा भीषण अपघात

जळगाव । मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चाळीसगाव आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस थेट उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. यात बसमधील 27 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व जखमींमा पिंपळगाव पसवंत येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव आगाराची एसटी (क्रमांक एम एच 40 एन 9817) बस चाळीसगाव येथून कल्याणच्या दिशेने जात होती. या दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर 13 नंबर लेनवर ही एसटी भरधाव वेगाने आली. यावेळी या एसटी बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने समोर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात बसमध्ये असलेल्या जवळपास 27 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या जखमी प्रवाशांना खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेमुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावर खान्देशाच्या दिशेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर नेहमी ठिकठिकाणी एसटी महामंडळाच्या बंद झालेल्या गाड्या नेहमी बघायला मिळतात. या गाड्या रस्त्यातच धोका देतात. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. एसटीला लालपरी म्हटलं जातं. लालपरीचा प्रवास अनेकांना आवडतो. पण याच लालपरीची अवस्था बिकट झालीय. अनेक गाड्या या जुन्या झाल्याने लांबच्या प्रवासावेळी धोका देतात. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. या जुन्या झालेल्या बसेसचं प्रशासनाला काही नियोजन करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.