भारतीयांना मिळणार तैवानमध्ये नोकऱ्या, किमान पगार 68000, कधीपासून?

भारतातील लोकांना लवकरच तैवानमध्ये सहज नोकऱ्या मिळतील. कारण भारत सरकार पुढील महिन्यात या संदर्भात तैवानशी करार करू शकते. या करारामुळे भारतीय कामगारांसाठी तैवानमध्ये स्थलांतराची प्रक्रिया सुलभ होणार आहे.  तैवानला सध्या अनेक क्षेत्रांमध्ये कामगारांची कमतरता भासत आहे. त्यामुळे आता तो इतर देशांतून विशेषत: भारतातून मजुरांच्या स्थलांतराचा विचार करत आहे.

याबाबतच्या कराराचा मसुदा तयार झाल्याचे वृत्त दिले आहे. दोन्ही देशांनी अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर सामंजस्य कराराचे नियम आणि कायदे ठरवले आहेत. आता दोन्ही देश पुढील महिन्याच्या सुरुवातीला त्यावर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा आहे. मात्र, कराराचा मसुदा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

तैवानला उत्पादन, कारखाने, बांधकाम, घरगुती कामगार, शेती आणि मत्स्यव्यवसाय यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये मजुरांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. भारताच्या मदतीने मनुष्यबळाची ही कमतरता दूर करता येईल, अशी तैवानला आशा आहे. भारताच्या ईशान्य भागातील कामगारांच्या स्थलांतराला तैवान प्राधान्य देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याचे कारण या भागातील लोकांची संस्कृती आणि खाद्यपदार्थ तैवानशी मिळत्याजुळत्या आहेत.

भारतीय कामगारांना या कराराचा अनेक प्रकारे फायदा होणार आहे. त्यांना तैवानमधील स्थानिक कामगारांइतकाच पगार मिळेल. तैवानच्या लोकांना ज्या प्रकारच्या आरोग्य सेवा मिळतात, तशाच सेवा भारतीयांनाही मिळतील. सध्या, तैवानच्या लोकांना दरमहा 26,400 तैवान डॉलर्स इतके किमान वेतन मिळते. यूएस डॉलरमध्ये ही रक्कम 820 डॉलर आहे, भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम अंदाजे 68,240 रुपये आहे.