ममता बॅनर्जींच्या घोषणेवर काँग्रेस म्हणाली ‘त्यांच्याशिवाय…’, काँग्रेसकडून डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, तयारीही जोरात सुरू आहे. देशातून भाजपची सत्ता हटवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी विरोधी पक्ष आघाडी इंडियाने उचलली आहे. मात्र आता ही युती डळमळीत झाल्याचे दिसत आहे.

मोठा राजकीय निर्णय घेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. या निर्णयावर भाजपसह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. एकीकडे भाजप ममतांना हतबल म्हणत आहे. दुसरीकडे, ममतांशिवाय युतीची कल्पनाच करता येणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

काय म्हणाली काँग्रेस ?
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं की, “तृणमूल काँग्रेस हा इंडिया आघाडीतील एक मजबूत खांब आहे. त्यामुळं ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीचा आम्ही विचारच करु शकत नाही. उद्या आमची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहे. सध्या इंडिया आघाडीत जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली असून लवकर याची घोषणा होईल, त्यानंतर सर्वजण समाधानी झालेले असतील.