‘मातोश्री २’ वरुन उध्दव ठाकरेंना भाजपाचा जबरदस्त टोला

मुंबई : नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. संसदेची जुनी इमारत असतांना नवीन का बांधली? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित होत आहे. यावरुनच सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता? असा खोचक सवाल भाजपाने विचारला आहे.

भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेची इमारत स्वतःसाठी नाही बांधली. भारताच्या भविष्याचा विचार करून देशासाठीच बांधली आहे. एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?, असा सवाल त्यांनी केला आहे.

संसद भवन उद्घाटनावेळी झालेले सगळे विधी आपल्या महान प्राचीन परंपरेचा अध्यात्मिक वारसा जपणारे होते. ‘सेंगोल’ची काठी करणार्‍या लोकांना ते समजण्याची अपेक्षा नाहीच. घराणेशाही, एका कुटुंबाची सत्ता उलथून टाकल्याच्या रागातून टीका करणे योग्य नाही. घराणेशाहीला भाजपामध्ये थारा नाही. भाजपा म्हणजे एक कुटुंबाची मालकी नाही. तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.

राजेशाही, हुकूमशाही ह्याबद्दल तुम्ही न बोललेलं च बरं. बाकी सामना मध्ये कितीही रेघोट्या मारल्या तरी जनतेच्या मनातली मोदींची प्रतिमेवर काहीच परिणाम होणार नाही असं म्हणत केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. यासोबतच ज्ञानोबा माऊलींचे शब्द नवीन संसदेच्या भिंतीवर कोरले आहेत! कुठे मराठी अस्मितेच्या नावाने खोटे गळा काढणारे आणि कुठे महाराष्ट्राची संस्कृती देशाच्या हृदयावर कोरणारे मोदीजी… असं देखील आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.