मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; वाचा काय म्हणाले आहे?

मुंबई : राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’सह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर 2024 पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाबाबत बैठक झाली. हे सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ‘मित्र’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासह नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक शाहजी केव्ही, एलआयसीचे अधिकारी आणि एसबीआय कॅपिटलचे कार्यकारी उपाध्यक्ष राजन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.