…म्हणून सावत्र बापाने तीन वर्षाच्या मुलीला संपवलं; खुनामागील धक्कादायक सत्य समोर

जळगाव : तीन वर्षाच्या मुलीला लाकडी दांड्याने मारहाण करून ठार केल्याची घटना रावेर शहरात ३१ मे रोजी घडली होती. या घटनेप्रकणी पोलिसांनी सावत्र बापासह सख्या आईला ताब्यात घेतले आहे. आता या खुनामागील कारणही समोर आले आहे. वैवाहिक संसारामध्ये दोन्ही मुले अडसर ठरत असल्यामुळे त्यांना सावत्र बापाने ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात मुलगा बचावला तर चिमुरडीला मात्र प्राण गमवावे लागले, अशी माहिती आता समोर आली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. माधुरीला भारतपासून पाच वर्षाचा मुलगा पियुष व तीन वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलसवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी दुसरे लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती.

मात्र काही दिवसातच अजय घेटे याला माधुरीच्या मुलांचा तिरस्कार व्हायला लागला. माधुरी सोबतच्या वैवाहिक संसारामध्ये अडसर ठरत असलेल्या पियुष व आकांक्षा या दोन्ही लहान मुलांना अजय घेटे हा मारहाण करत असे. त्यांना रात्री घराबाहेर झोपवत असे. त्यांचा अजयने छळ चालवला होता, अशी माहिती लहानग्या पियुषने त्याचे वडील भारत म्हसाने यांच्याकडे दिली आहे.

दरम्यान, ३१ मे रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी दोन्ही मुलांना मारहाण करायला सुरुवात केली. यात मुलगा पियुष हा जीव वाचवत घराच्या बाहेर पळत सुटला. पण तीन वर्षाची आकांक्षा ही मात्र अजयच्या तावडीत सापडली.३१ मे रोजी सकाळी ९ वाजेपूर्वी अजयने माधुरी हिच्या दोन्ही मुलांना मारहाण करायला सुरुवात केली. यात मुलगा पियुष हा जीव वाचवत घराच्या बाहेर पळत सुटला. पण तीन वर्षाची आकांक्षा ही मात्र अजयच्या तावडीत सापडली. यात आकांक्षाचा मृत्यू झाला.

…मग गाठले पोलीस स्टेशन
धक्कादायक म्हणजे, अजयच्या पत्नीला म्हणजेच आकांक्षाच्या आई माधुरी हिला आकांक्षाच्या मृत्यूबद्दल समजताच तिने पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने आकांक्षाला बेलसवाडी येथे घेऊन आली. मात्र त्या ठिकाणी गावातीलच एकाने फिर्यादी तथा आकांक्षाचे वडील भारत म्हसाने यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर भारत म्हसाने व त्यांच्यासोबतचे नातेवाईक यांनी बेलसवाडी येथे येऊन आकांक्षा हिला सोबत घेत अंतुर्ली पोलीस स्टेशन गाठले.

त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, आकांक्षा मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात भारत म्हसाने यांनी संशयित आरोपी अजय घेटे आणि पत्नी माधुरी म्हसाने-घेटे यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ हे करीत आहे.