रस्ते अपघातात जखमी; नो टेन्शन… सरकार करणार दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

जरा कल्पना करा, तुम्ही रस्त्याने जात आहात आणि अचानक तुम्हाला एखादी जखमी व्यक्ती दिसली, ज्याच्या भोवती गर्दी जमलेली असते पण त्याला कोणीही मदत करत नाही. रुग्णालयात नेल्यास उपचाराचा खर्च कोण उचलेल, असा विचार करून तुम्हीही मदत करण्यात कुचराई करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना सरकार दीड लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत देते. ही सुविधा तुम्हाला कधीतरी उपयोगीही पडू शकते.  चला तर जाणून घेऊया याबाबतची संपूर्ण माहिती.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकताच एक पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. रस्ते अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचता यावेत यासाठी शासनाने हा प्रकल्प सुरू केला आहे.

असा होईल फायदा 
कोणत्याही प्रकारच्या मोटार वाहनाने जखमी झाल्यानंतर एखादी व्यक्ती रुग्णालयात पोहोचल्यास या प्रकल्पांतर्गत त्याला दीड लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत, एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त 7 दिवस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता येते.

या उपचारासाठी खर्च झालेला पैसा सरकार थेट रुग्णालयाला देणार आहे. यासाठी रुग्णालयांना प्रतिपूर्ती बिले सादर करावी लागतील. मात्र, सध्या ही योजना चंदीगडसह देशाच्या काही भागात पायलट प्रोजेक्ट अंतर्गत सुरू आहे. लवकरच त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी होऊ शकते.

सरकार पैसे कुठून आणणार ?
या योजनेसाठी सरकारला पैशांची कमतरता भासणार नाही, कारण हा निधी ‘मोटार वाहन अपघात निधी’मधून दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक प्रकारच्या रस्ते अपघातात मिळेल ज्यामध्ये मोटार वाहनाचा समावेश आहे.

ही योजना जमिनीवर राबवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण काम करेल. सध्या ते पायलट प्रोजेक्ट अंतर्गत राबवत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, रुग्णालय आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे.