राजीनाम्यानंतर वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया; वाचा काय म्हणालेय ?

Vasant More : मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण वारंवार माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काही न काही आरोप केले. वसंत मोरे नाराज आहे. जेव्हा पासून मनसेत आहे तेव्हापासून मी स्वकेंद्रीत राजकारण करत आलो, असं माझ्याबद्दल बोललं गेलं. तिथे राहून उगाच माझ्या चारित्र्यावर आणि वागणुकीवर आरोप होत असतील, तर अशा ठिकाणी न राहिलेलं बरं, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली.

वसंत मोरे यांनी सकाळी मनसेवर नाराजी व्यक्त करत दुपारी थेट राजीनामा दिल्याची फेसबूक पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, मनसेला सोड चिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

ते पुढे म्हणाले की, तर आता कोणत्या पक्षाकडून ऑफर आली आहे का यावर बोलताना ते म्हणाले, माझी आता कुठलीही भूमिका नाही. मी सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्ष सदस्यत्व सोडलं आहे. मी संघटनेत नाही. माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील. पुढच्या दोन-तीन दिवसात भूमिका जाहीर करेन.