राष्ट्रवादीमुळे अस्वस्थता, शिंदे गटातील आमदार घरवापसीच्या तयारीत?

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एन्ट्री केल्यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला नक्की संधी मिळेल, अशी स्वप्नं रंगवत असलेल्या शिंदे गटातील आमदारांचे मनसुबे राष्ट्रवादीच्या समावेशामुळे पार धुळीला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटातील आमदारांचा एक गट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याविषयी चर्चा करत असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

अजितदादा आणि कंपनीने तिकडे उडी मारली त्याच दिवशी शिंदे गटातील आमदारांनी बंडखोरीच्या हालचाली सुरु केल्या. आमदारांचा हा उद्रेक थांबवताना एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक आमदार म्हणत आहेत, आम्ही ज्या घरात होतो, तिथेच बरं आहोत. मातोश्रीने आम्हाला साद घातली तर आम्ही नक्की त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं वक्तव्य एका मंत्र्याने केले. मातोश्रीची क्षमा मागून परत जावे का, याबद्दल संबंधित आमदारांमध्ये विचारविनिमय सुरु असल्याची माहिती आम्हाला समजल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

नव्या सत्ता समीकरणांनुसार शिंदे गटाच्या वाट्याला आणखी जेमतेम तीन ते चार मंत्रिपदे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यात आपली वर्णी लागावी यासाठी शिंदे गटातील आमदारांतच चुरस निर्माण झाली आहे. काही आमदारांनी ‘गेले वर्षभर ज्यांना मंत्रिपद उपभोगता आले, त्यांना हटवून इतरांना संधी द्या’ अशी जाहीर मागणी केली आहे. मंत्रिपदावर दावा करणार्‍या दोन आमदारांमध्ये मंगळवारी शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका टोकाला गेला की उभयंतांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याची चर्चा आहे.