लग्नाहून परतणार्‍या चोपड्यातील प्रौढाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू : पत्नीसह मुलगा गंभीर

यावल : भुसावळ येथून लग्न आटोपून पत्नी व मुलासह यावलमार्गे चोपडा शहराकडे निघालेल्या प्रौढाचा बेपवाईने दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यावल शहराबाहेरील पाटचारीजवळ गुरुवारी दुपारी हा अपघात घडला. राजू बशीर पिंजारी (57, रा. फुलेनगर, चोपडा) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पिंजारी यांचा उष्माघातानेही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण समोर येणार आहे. पिंजारी हे पत्नी रूक्शानाबी राजु पिंजारी (52), मुलगा मुक्तार राजु पिंजारी (16) हे तिघे दुचाकीद्वारे यावलमार्गे चोपडा जात असताना गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान यावल शहराजवळील पाटचारीजवळ राजु पिंजारी यांना उन्हाचा त्यांना फटका बसला आणि चक्कर येऊन ते चालत्या दुचाकीसह रस्त्याच्या कडेला कोसळले. त्यात दुचाकीचा अपघात होवून पिंजारी हे बेशुद्ध झाले तर महिला व मुलगा जखमी झाले.

यावल पोलिसात अपघातात
अपघाताची माहिती कळताच घटनास्थळावरून 108 वाहनाद्वारे तिघांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. रुग्णालयात डॉ.इरफान खान, डॉ. प्रशांत जावळे, अधिपरीचारक जॉन्सन सोरटे, कादर तडवी आदींनी उपचार केले. दरम्यान राजू बशीर पिंजारी यांचा जागीच मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. जखमी असलेल्या रुक्सनाबी व मुक्तार पिंजारी या दोघांना चोपडा येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.