लम्पिचा धुमाकूळ! 35 जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सलग दुसऱ्या वर्षी लम्पी संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातल्याचे समोर येत आहे. धुळे जिल्ह्यात तब्बल 52 गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली असून 896 जनावरे लम्पिच्या विळख्यातून बरे झाले आहेत.

गेल्या वर्षभरापासून राज्यभरात लम्पीचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाला मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक धुळे जिल्ह्यात खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सातत्याने लसीकरण, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र अजूनही काही जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव सुरूच आहे.

गोवंशात आढळणाऱ्या लम्पी या आजाराने मागील वर्षी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात आल्यानंतर ही साथ नियंत्रणात आली होती. मात्र यावर्षी पुन्हा लंपीने डोके वर काढले असून धुळे जिल्ह्यात तब्बल 52 गावांमध्ये लम्पीचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली आहे, जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोवंश जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही तालुक्यातील आठवडे बाजारात गोवंशय जनावरे विक्रीसाठी आणण्यात येत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. दरम्यान, लम्पी या आजाराने पशुधन दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.