लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध ; काय आहेत महत्वाच्या घोषणा? वाचा..

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला  ‘मोदी की गारंटी’ हे नाव दिले. भाजपचं संकल्पपत्र विकसित भारताच्या सर्व चार मजबूत स्तंभांना – युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकरी सक्षम करते. राहणीमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्या वाढवण्यावर आमचं लक्ष आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजप प्रमुख जेडी नड्डा आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

या आहेत घोषणा?

भाजपच्या या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा आहेत. त्यात गरिबांना पुढील ५ वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. जेनरीक औषधी ८० टक्के स्वस्त देण्यात येणार आहे, ही आश्वासने आहे. तसेच ७० वर्षांवरील लोकांसाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेत आणण्यात येणार आहे. प्रत्येकाला पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहे. गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले.

यावेळी पक्षाचे अध्यक्ष नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपली भाषणे दिली. भाजपने पाच लाख सूचनांच्या आधारे आपले ठराव पत्र तयार केले आहे. ज्याची थीम ‘मोदीची हमी: विकसित भारत 2047’ अशी ठेवण्यात आली आहे.

मोदींच्या नेतृत्वात आम्ही सगळे संकल्प पूर्ण केले, असं जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बोलताना सांगितलं आहे. २०१९ ला केलेलं संकल्प आम्हाला पूर्ण करण्यात मागच्या ५ वर्षात यश  आलं. जो आम्ही बोलतो ते आम्ही पूर्ण करतो, असंही ते म्हणाले आहेत. हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी दिवस रात्र आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं आहे.

काय आहेत महत्वाच्या घोषणा
पुढील पाच वर्षे गरीबांना मोफत धान्य
आणखी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार
७० वर्षांवरील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहचवणार
मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार
‘पीएम किसान’ योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार
महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार
कोट्यवधी लोकांची वीजबिल शून्य करणार
पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल
5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु