वरणगावात वर्‍हाडींना मधमाशींच्या चाव्याची पंगत : छायाचित्रकारासह 15 जखमी

भुसावळ : तालुक्यातील तळवेल येथील बाळकृष्ण  पुरुषोत्तम पाटील यांच्या मुलाचा विवाह शुक्रवार, १७ मार्च रोजी नागेश्वर मंदिर, वरणगाव येथील सप्तशृंगी माता मंदिर हॉलमध्ये होता. लग्न समारंभ सुरू असतांना हॉलमध्ये असलेल्या लाल मधमाशांनी लग्नातील पाहुणे मंडळीवर हल्ला केल्याने वऱ्हाडीमध्ये चांगलीच धावपळ उडाली.
वऱ्हाडी धावले सैरावैरा
तळवेल येथील वर व हिंगोणा, तालुका यावल येथील वधू यांचा विवाह सोहळा वरणगावजवळ सप्तशृंगी माता हॉलमध्ये ठेवण्यात आला होता. लग्न लागल्यावर जेवणाच्या वेळेस अचानक हॉलमध्ये असलेल्या लाल मधमाशांनी वऱ्हाडी मंडळीवर हल्ला चढवल्याने  वऱ्हाडी मंडळीं जेवण सोडून सैरावैरा पळत सुटले तर मधमाशांनी या घटनेत जवळपास पंधरा ते वीस जणांना  चावा घेत घेतल्याचे सांगण्यात आले. त्यात प्रमिला बाळकृष्ण झांबरे (ओझरखेडा), सुभाष पुरुषोत्तम पाटील (भुसावळ), सुमित राजेंद्र बढे (फोटोग्राफर) , आकाश गजानन पाटील (चांगदेव), योगेश पाटील  (कासारखेडा), भोजराज पाटील (बेटावद) यांना मोठ्या जास्त प्रमाणात मधमाश्यांनी  चावा घेतल्याने त्यांच्यावर वरणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दोन वर्ष पूर्वी देखील घडली होती घटना
दोन वर्षांपूर्वी तळवेल येथील संजय नारायण कापसे यांच्या मुलाच्या विवाह प्रसंगी सुद्धा याच ठिकाणी अशी घटना घडलेली होती. त्यानंतर संस्था चालकांनी कुठलीही दक्षता न घेत कार्यक्रम बुक करून हॉल भाड्याने देणे सुरूच ठेवले. वास्तविक पाहता ठिकाणी अग्निशमन दलाचे प्रशिक्षण केंद्र असून या   केंद्रामार्फत  मधमाशांचा बंदोबस्त करण्याचे काम होऊ शकते परंतु संस्थेने यावर कोणताही उपाय केला वऱ्हाडींना संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.