विरोधकांचा प्लॅन बी म्हणजे फुसका बॉम्ब; कुणी केली टीका

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. सेनेचे १६ आमदार अपात्र होणार असून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या देखील वावड्या विरोधी पक्षाकडून उठवल्या जात आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले असून विरोधकांचा प्लॅन बी म्हणजे फुसका बॉम्ब असल्याचे म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते गुरुवारी पुण्यात बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री बदलाबाबत केले जाणारे दावे आणि अपात्रता प्रकरणावरून त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष केले. विरोधकांना काहीच सुचत नसल्याने त्यांच्याकडून प्लॅन बी नावाचा फुसका बॉम्ब सोडण्यात आला आहे. भाजपकडे अशाप्रकारचा कुठलाही प्लॅन बी नसून त्याबद्दल माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. महायुतीचे लक्ष्य ४५ हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचे असून जनता मोदीजींच्या कामांकडे पाहूनच मते देणार आहे,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
व्यक्तिगत, मर्यादाबाह्य टीका अशोभनीय!
”राजकीय मतभेद असतील पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, हे अशोभनीय राज्याच्या संस्कृतीला सोडून तसेच भाजपच्या संस्कृतीत बसणारे विधान नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची दखल घेऊन आपण आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपण पडळकर यांच्याशी चर्चा केली असून पडळकर यांनीही पडळकर यांच्या विधानाबद्दल पवार यांची दिलगिरी व्यक्त करत आहे,” असे म्हणत बावनकुळे यांनी व्यक्तिगत आणि मर्यादाबाह्य टीका अशोभनीय असल्याचे म्हटले आहे.

बावनकुळे म्हणाले, प्रत्येकाला समाज महत्वाचा असून त्याबाबतच्या समस्या मांडाव्याच लागतात, न्याय मिळवून द्यावा लागतो. धनगर समाजात आजही मागासलेपणा असून मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भूमिका महत्वाची आहे. धनगर समाजाला न्याय मिळावी ही भाजपाची भूमिका आहे. मराठा आरक्षणाला सर्वांचे समर्थन मिळाले असून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायलयात योग्य भूमिका न मांडल्यानेच आरक्षण टिकले नाही.
संसदेच्या कायद्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे काम सुरू आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने प्रभावशाली व्यक्ती राष्ट्रपती म्हणून मिळाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच त्यांना सन्मान दिला आहे. विरोधकांच्या इन्डी आघाडीच्या लोक राजकारण करून संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांचे घटक पक्षातील नेते उदयनिधी स्टॅलीन यांना हिंदू धर्माचा अपमान केला, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ते नवे रान उठवित आहेत.