शाहिद एसडीआरएफ जवानाच्या कुटुंबियांचे मंत्री अनिल पाटलांनी केले सांत्वन 

अमळनेर : भडगाव तालुक्यातील पांढरद येथील रहिवासी असलेला एसडीआरएफचा जवान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदी पात्रात बचाव कार्य सुरू असताना शाहिद झाल्याने राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी त्याच्या गावी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांनी प्रशासनास त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या काळात योग्य ती मदत करण्याच्या सूचना करत सरकार या घटनेतील इतर शाहिद जवानांसह या कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला होता. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला.यात जळगाव जिल्ह्यातील जवान वैभव सुनिल वाघ याचाही समावेश आहे.

वाचवण्यासाठी आले अन् त्यांचाच जीव गेल्याने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने अनिल भाईदास पाटील यांनीही दुःख व संवेदना व्यक्त केल्या.तसेच जळगाव जिल्ह्यात दाखल होताच आधी भडगाव तालुक्यातील पांढरद गावी धाव घेऊन शाहिद वैभव वाघ यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली यावेळी प्रशासनातील अधिकारी देखील त्यांच्या सोबत होते.

यावेळी मंत्री पाटील बोलताना म्हणालेत की एसडीआरएफ जवान हे होम डिपार्टमेंट कडून यात दाखल झाले असतात, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कोणत्याही क्षणी व कोणत्याही ठिकाणी सूचना मिळताच मदतीसाठी ते धावून जात असतात, दुसऱ्याच जीव वाचविण्यासाठी फार मोठे योगदान त्यांचे असते मात्र बचाव कार्यात अश्या दुर्घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात होत असतो. त्यामुळे भविष्यात अश्या दुर्घटना घडल्यास एनडीआरएफ प्रमाणेच एसडीआरएफ देखील निर्णय घेईल आणि सरकार या जवानांच्या पाठीशी उभे राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.