शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा; तब्बल 50 हजार पदे भरणार

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसर्‍या टप्प्यात जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी मोठी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसंच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असं केसरकर यांनी म्हटलं.

शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.