शिक्षणमंत्री केसरकरांची मोठी घोषणा; राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती

कोल्हापूर : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही असं केसरकर यांनी म्हटलं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत बोलताना केसरकर यांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनाही यावेळी केसरकर यांनी दिल्या आहेत.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची जी पद्धत आहे, त्याच पद्धतीनं आता आदित्य ठाकरे बोलत आहेत. मी अगोदरच सांगितलं होतं की बोलायची वेळ आणू नका. मात्र आदित्य ठाकरे बेलगाम सुटले आहेत. ठाकरे कुटुंबाप्रती आदर होता म्हणून आम्ही आमच्यावर बंधणं घालून घेतली होत, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.