शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रोज पार करावी लागते नदी; ७० वर्षांपासून ही समस्या, पण…

नंदुरबार : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नवापूर तालुक्यातील करंजाळी ग्रामपंचायत अंतर्गत फत्तेपूर वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदीतून चार पाच फूट पाण्यातून जीव धोक्यात घालून ग्रामस्‍थांना जावे लागत असल्याचा समोर आलं आहे.

जिल्ह्यात कालपासून पाऊस सुरु असल्याने अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पुलाची व्यवस्था नसल्याने अनेक नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे.

नवापूर तालुक्यातील करंजाळी गावाजवळची असलेल्या वस्तीवर जाण्यासाठी येथील नेसू नदीला आलेल्या पुरातून नागरिक प्रवास करत आहेत. गावातील शाळेकरी विद्यार्थ्यांना खांद्यावर बसून पालकांना नदीतून धोकादायक पद्धतीने मार्गस्थ व्हावे लागत आहे.

करंजाळी गावातील ही समस्या गेल्या 70 वर्षांपासून सुरु आहे. आजपर्यंत गावातील दोन वस्तींना जोडणारा पूल तयार होऊ शकला नाही. ग्रामस्थांनी या गावात पूल तयार करुन द्यावा, अशी मागणी केली आहे.

करंजाळीतील फतेपूर वस्तीत जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने नदीतूनच यांना मार्गस्थ व्हावे लागते. गावकऱ्यांसह पालकांच्या खांद्यावर बसून येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नदी पार करावी लागत आहे. करंजाळी गावातून नेसू नदी गेली असून गावाचे दोन भाग झाले आहे, एका भागातून दुसऱ्या भागात रस्ता नसल्याने गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर पुल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.