शिरपूरमध्ये पोलिस ठाण्यावर दगडफेक; ७० ते ८० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल

धुळे : शिरपूर येथील पोलिस ठाण्यावर गुरुवार, २५ रोजी जमावाने दगडफेक केली. याप्रकरणी ७० ते ८० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे; तर ज्या आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी हा दगडफेकीचा प्रकार घडला त्या तिघांना २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

करवंद येथे बुधवार, २४ रोजी  एका वादातून जामा नामू भिल (४५) यांचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित विजय कोळी याच्यासह उर्वरित दोघांना करवंद गावाबाहेरील शेतातून पकडण्यात आले.

दरम्यान, गुरुवार, २५ रोजी मयताच्या आप्तांनी मारेकऱ्याला आमच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी शिरपूर पोलिस स्टेशनवर मोर्चा काढत दगडफेक केली होती. याप्रकरणी पोलिस हवालदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिस ठाण्यात ७० ते ८० जणांविरोधात भादंवि विविध कलमांसह सार्वजनिक मालमत्तेस नुकसान प्रतिबंध अधिनियम ३, १, सह मुंबई पोलिस अधिनियम कलम ३७, १, ३ चे उल्लंघन १३५ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.