शिवसेना ठाकरे गट पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय केव्हा घेणार, याचा कालावधी निश्चित करण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांना दिल्यानंतर या प्रक्रियेला आता वेग आला आहे. या प्रकरणी येत्या सोमवारपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता उच्चस्तरीय सूत्रांनी वर्तवली आहे.

या संदर्भात शनिवारी माजी मुख्यमंत्री ठाकरे आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवली जाणार आहे. सोमवारपासून दोन्ही गटाच्या आमदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. मागील आठवड्यात सुनावणी सुरू झाली होती. त्यानंतर आमदारांनी एक आठवडा वेळ मागितला होता. ठरलेल्या वेळेनुसार सुनावणी होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली आहे. 14 सप्टेंबरच्या सुनावणीत दोन्ही गटांच्या आमदारांनी आपली बाजू अध्यक्षांसमोर मांडली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला. दरम्यान, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिल्ली गाठून कायदेतज्ज्ञांची भेट घेतली आणि चर्चा केली. निर्णय घ्यायला वेळ लावणार नाही तसेच घाई करून चालणार नाही, असे नार्वेकर म्हणाले होते.

शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. कारण विधान परिषद आमदारांच्या अपात्रता सुनावणीवरून पेच निर्माण झाला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या तिघांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या तिघांनाही अपात्र ठरवण्यासाठी अनिल परब यांच्याकडून विधिमंडळ सचिवालयात याचिका दाखल करण्यात आली. सभापतिपद रिक्त आहे. नीलम गोर्‍हे उपसभापती असल्याने त्यांना यावर सुनावणी घेता येणार नाही. त्यामुळे सुनावणी कोण घेणार, असा कायदेशीर पेच निर्माण झाला. तिघांची आमदारकी रद्द करा, यासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीला विलंब होत असल्याने ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करीत आहे.