शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन, शेवटचे दोन दिवस शिल्लक

Agriculture News : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन 2023 मधील पीक स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. या पीक स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कृषी विभागामार्फत या चालू खरीप हंगामात सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबवण्यात येत असल्याची माहिती पुणे कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली.

स्पर्धेसाठी अटी आणि शर्ती
या स्पर्धेसाठी काही स्पर्धेसाठी अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी. ती जमीन तो स्वत: कसत असावा. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.

पीक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर आणि इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयची कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ),  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीक निहाय बक्षीस देण्यात येणार आहेत. यामध्ये तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी पाच हजार, द्वितीय तीन हजार आणि तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये, जिल्हा पातळीवर 10 हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम 50 हजार, द्वितीय 40 हजार तसेच तृतीय 30 हजार रुपये बक्षीस असणार आहे.

दरम्यान, या योजनेबाबत अधिक माहिती या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.