शेत शिवारात बांधलेल्या गाईच्या वासरावरती बिबट्याचा हल्ला, लोकांमध्ये भीतीचं वातावरणं

फरकांडे, एरंडोल : येथील जानफळ शिवारातील शेतात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, वासराच्या शरीराचा अर्धवट भाग खाऊन सोडून दिले. या घटनेमुळे परिसरात लोकांमध्ये भीतीचं वातावरणं पसरलं आहे.

येथील जानफळ शिवारात बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी गोकुळ कोळी यांच्या शेतात बांधलेल्या गायचा एका वासरूवर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, वासराच्या शरीराचा अर्धवट भाग खाऊन सोडून दिले आहे. शेतकरी गोकुळ कोळी हे आज सकाळी चारा पाणी व दूध काढण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील अमृत देशमुख यांच्याशी संपर्क करून वनविभागाला कळवले.

वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जागेवरील हिंस्र प्राण्याचे पायांच्या ठशांचे निरीक्षण केले असता बिबट्यानेच वासरू मारून खाल्ल्याचे स्पष्ट केले. फरकांडे व जानपळ शिवारातील शेतकऱ्यांनी आपले पशुधन शेतात न बांधता गुरांना घरीच बांधावे. शेतकरी शेतमजूर यांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. सदर शेतकऱ्याचे 20 ते 25 हजार रुपये पशुधनाचे नुकसान झाले असून मदत मिळण्याची मागणी केली आहे.