सकाळची वेळ, शेतकऱ्याला अचानक काही तरी चावल्यासारखं झालं… घटनेनं हळहळ

जळगाव : शेतामध्ये गाईला चारा टाकत असताना सापाने दंश केल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ११ जून रोजी सकाळी १०:३० वाजता बांभोरी येथे घडली. प्रल्हाद कौतिक पाटील (७०, रा. बांभोरी, ता. धरणगाव) असे मृत शेतकरीचे नाव आहे.

प्रल्हाद पाटील हे मंगळवारी सकाळी शेतात गाईला चारा टाकत होते. त्यावेळी त्यांना तेथे सापाने दंश केला. हा प्रकार त्यांनी लगेच शेतातच असलेल्या मुलांना सांगितला. त्यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र संपूर्ण शरीरात विष पसरल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.