सत्यमेव जयते, हा लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय

Maharashtra Politics : आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल होता, अखेर सत्याचा विजय झाला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच आमचं सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज कालबाह्य केलं आहे असंही ते म्हणाले.

लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे, या देशात संविधान आहे त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामधून स्पष्ट झालं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही स्थापन केलेलं सरकार हे कायद्याला धरुन आहे हे स्पष्ट झालं, बेकायदेशीर सरकार म्हणणाऱ्यांना आज सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं आहहे असंही ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही या निर्णयावर समाधानी असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणत उड्या मारत होते त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फिरल्याचे फडणवीस म्हणाले.