सभेआधीच आ. किशोर पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले..

पाचोरा : येथे आज सायंकाळी शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून सभेआधीच पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.

नेमकं काय म्हणाले आ. पाटील?
पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या सभेवर भाष्य केलं. पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बाळासाहेबांसारखी जादू नाहीये. उद्धव ठाकरेंमध्ये एवढी ताकद असती तर त्यांनी 288 मतदारसंघात सभा घेतल्या असत्या. तसेच सर्वच सभांमधून उमेदवार निवडून आणले असते. असे 50 आणि 50 आमदारांवर ते थांबले नसते. त्यामुळे त्यांच्या इतकी काही जादू नाहीये. त्यांची भाषणं तीच तीच आहेत अशी टीका पाटील यांनी केली आहे.

माझा बाप चोरला… माझा बाप चोरला. अरे बाबा… बाप चोरला हे माहीत आहे, कुणी चोरला हे माहीत आहे तर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार द्या ना असं डिवचतानाच उद्धव ठाकरे यांच्या सभेला 25 हजारापेक्षा जास्त लोक जमणार नाहीत. 25 हजाराच्यावर 26 हजारावी खुर्ची आली तर मी राजकारण सोडून देईल असा दावाही किशोर पाटील यांनी केला आहे.