हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी घेतली तत्काळ दखल, पोलीसांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई : शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. तसेच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्याना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. यावेळी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून तब्येतीबद्दल विचारणा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच गेल्या काही दिवसांपासून शाळेपासून 100 मीटरच्या अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याच गोष्टीचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा अशी शक्यता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे त्यांना आशवस्त केले. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी देखील संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेणार आहेत.