१०वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार प्रतिनिधींची निवड

जळगाव : टपाल विभागाच्या टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल योजनांच्या विक्रीसाठी ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची थेट नेमणूक केली जाणार आहे. यासाठीच्या मुलाखती ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जळगाव विभाग डाकघरचे अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

किमान इयत्ता १० वी पास असलेले, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी , माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार किंवा स्वयंरोजगार असणारे 18 ते 60 वर्षं वयोगटातील उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव, पांडे चौक, पहिला मजला, मुख्य डाकघर, जळगाव -४२५००१ यांच्या कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ३ वाजेच्या कालावधीत मुलाखती होणार आहेत.

इच्छुक उमेदवारांना विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे. उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल नसावा. निवड ही इयत्ता १० वी च्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता व मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.

मुलाखतीस येताना जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ई-मेल आयडी व इतर आवश्यक कागदपत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे घेऊन यावीत. असे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.