10वी-12वी परीक्षेसंदर्भात बोर्डाचा अत्यंत महत्वाचा निर्णय ; विद्यार्थ्यांनो काय आहे वाचा

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी-१२वी परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार आहे.

सोबतच परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. इयत्ता 10 व 12 वीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्यात येत आहे.

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांची वेळी सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात सकाळी 10.30 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रामधील 11 ते 2.10, 11 ते 1.10, 11 ते 1.40 अशी वेळ असणार आहे. तर दुपारच्या सत्रातील 3 ते 6.10, 3 ते 5.10, 3 ते 5.40 अशा प्रकारे सर्व पेपरसाठी वेळ 10 मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.