रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता मिळणार १० पट अधिक नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पूर्वीपेक्षा १० पट अधिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वेने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, रेल्वे अपघात आणि अनुचित घटनांमध्ये प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या निधीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबतच रेल्वेच्या प्रथमदर्शनी दायित्वामुळे मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंगवर अपघात झालेल्यांनाही अधिक भरपाई मिळणार आहे. रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना ३० दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल केल्यास त्यांना अतिरिक्त भरपाई मिळेल. तसेच, जखमी प्रवाशांना प्रत्येक १० दिवसांच्या कालावधीच्या शेवटी किंवा डिस्चार्जच्या तारखेला, यापैकी जे आधी असेल त्यांना दररोज ३ हजार रुपये दिले जातील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सुधारित सानुग्रह अनुदानाची रक्कम १८ सप्टेंबरपासून लागू केली जाईल.

किती रुपये मिळतील?
रेल्वे आणि मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना आता ५० हजार रुपयांऐवजी ५ लाख रुपये, तर गंभीर जखमींना २५ हजार रुपयांऐवजी २.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना ५ हजार रुपयांऐवजी ५० हजार रुपये मिळणार आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही अनुचित घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना, गंभीर जखमी आणि मध्यम जखमी प्रवाशांना अनुक्रमे १.५ लाख रुपये, ५० हजार रुपये आणि ५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल.