---Advertisement---

ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण, आजचा पालखीचा मुक्काम कुठे?

---Advertisement---

ashadi wari २०२३ : अडीच  दिवसांच्या विश्रांतीनंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तरडगांव मुक्कामी जाण्याची तयारी सुरू झाली. परंपरेप्रमाणे पहाटे संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई  यांच्या हस्ते माऊलींची महापूजा करण्यात आली. त्यानंतर भक्तांच्या हस्ते पूजा करण्यात आल्या. कोकण, कर्नाटकासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदि जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. संत ज्ञानोबांची पालखी आज तरडगावला मुक्कामी असणार आहे.

फलटण तालुक्यात स्वागत

अडीच  दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारी १ वाजता श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणासाठी तरडगांवकडे मार्गस्थ झाला. व्यापारी पेठ, एस.टी.स्टॅण्ड, अहिल्यादेवी होळकर चौक येथील स्वागत व निरोप स्विकारून सोहळा लोणंद-फलटण मार्गावर आला. दुपारी २ वाजता कापडगांव येथे सोहळ्याचे फलटण तालुक्याच्या वतीने आ.दिपक चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले ,  तहसिलदार अभिजीत जाधव , उपविभागीय पोलिस उप अधीक्षक राहूल धस , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार , महानंदाचे व्हा चेअरमन डी के पवार , कापडगावच्या  सरपंच कल्पना खताळ , उपसरपंच रामभाऊ केसकर , ग्रामसेविका वर्षा रणवरे यांच्यासह असंख्य ग्रामस्थानीं माऊलींसह सोहळ्याचे स्वागत केले. तर नगराध्यक्ष मधुमती पलंगे , उपनगराध्यक्ष शिवाजीराव पाटील शेळके यांच्यासह नगरवासियांनी माऊलीसह सोहळ्याला निरोप दिला.

नेत्रदीपक रिंगण सोहळा
उभ्या रिंगणासाठी दुपारी ३  वाजता अश्‍व आयुर्वेद सिटी येथे दाखल झाले.  सायंकाळी पावणे चार वाजता माऊलींचा रथ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचला. चोपदार राजाभाऊ यांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी चार वाजता रिंगणासाठी अश्‍व सोडण्यात आले आणि दोन्ही अश्‍वांनी रथासमोरील २७ दिंड्या व रथामागील १० दिंड्यांपर्यंत नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सुरूवातीला स्वाराचा अश्व पुढे धावला .  माऊलींचा  अश्व नवीन असल्याने तो स्वाराच्या अश्वामागे  धावत होता. त्यानंतर अश्वानी धावत धावत रथाला प्रदक्षिणा मारली . रथाजवळ येवून  अश्‍वांनी माऊलींचे दर्शन घेतले. सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी अश्‍वाला प्रसाद दिला. त्यानंतर माऊलीचा अश्‍व पुढे तर स्वाराचा अश्‍व त्याच्या मागे धावत सोहळ्याच्या अग्रभागी जावून पोहोचला.  चोप उंचावल्यानंतर ” तुकाराम तुकाराम ”  नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा पूर्ण केला. या रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यादिड्यांमध्ये विविध खेळ सुरू झाले.

सकाळपासूनच उन्हाच्या कडाका होता .  यंदा अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने दिंडीतील वारकरी वगळता इतर  हजारो भाविकांनी  पहाटेच  तरडगाव मुक्कामी जाणे पसंद केले . त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा   उभ्या रिंगण सोहळ्याला भाविकांची गर्दी दिसून आली नाही . मात्र रिंगण सोहळ्याने उपस्थित  वारकर्‍यांच्या वाटचालीत चैतन्याची भर टाकली.  रिंगण सोहळा पाहण्यासाठी लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, पर्‍हार खुर्द, हिंगणगांव, राहुडी, माळेवाडी, शिंदेमळा आदि गांवातील भाविकांनी मात्र गर्दी केली होती .  सातारा जिल्हा परिषदेने ठिकठिकाणी पाण्याचे टॅंकर उभा केल्याने भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली.

तरडगांव येथे सायंकाळी ६ वा. हा सोहळा पोहोचला. त्यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. येथे सोहळ्याचा एक दिवस मुक्काम असून उद्या ( बुधवार ) हा सोहळा एक  दिवसांच्या फलटण मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. यंदा वारीत वाहनांची संख्या निम्याने घटल्याने  लोणंद ते तरडगाव या मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात पोलिसांना फारशी अडचण आली नाही. पालखी मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment