32nd Convocation Ceremony : विद्यापीठे, शिक्षक, संशोधक आणि नवकल्पना, उद्योजकता यावर भारताची प्रगती : कुलपती रमेश बैस

32nd Convocation Ceremony :  जगातील तिसरी आघाडीची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची प्रगती ही विद्यापीठे, शिक्षक, संशोधक आणि नवकल्पना, उद्योजकता यावर अवलंबून आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांनी स्टार्टअप सुरू करून नोकरी देणारे व्हा असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैंस यांनी  केले.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 32 वा दीक्षांत समारंभ गुरूवार, 29 फेब्रुवारीला झाला. या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्षीय भाषण करतांना कुलपती बैस बोलत होते. यावेळी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सरचिटणीस डॉ. श्रीमती पंकज मित्तल यांचे दीक्षांत भाषण झाले. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्य.प. सदस्य यांची उपस्थिती होती.

 

श्री. बैस यांनी या विद्यापीठाकडून अपेक्षा व्यक्त करतांना सांगितले की, राज्य सरकारच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने लहान गटातील विद्यापीठांना प्रोत्साहन दिले पाहिजे. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उद्योजक आणि नवोन्मेषक बनण्यासाठी प्रोत्साहीत करावे, आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे आणि माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून विद्यापीठाच्या वाढ आणि विस्तारात सहभागी करून घ्यावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या परदेशी विद्यापीठांशी विद्यापीठाने भागिदारी करावी. कृत्रिम बुध्दीमत्ता आणि मशिन लर्निंगच्या युगात आपण जगत आहोत. त्यामुळे आरोग्य सेवा व शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे व्यापक परिवर्तन होणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुध्दिमत्तेचा फायदा तोट्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे.

 

विद्यापीठाच्या वाटचालीविषयी कौतुक करतांना श्री. बैस म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करीत आहे याचा आनंद आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात हे विद्यापीठ अग्रेसर आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहे. ही अभिमानाची बाब आहे. कुलपती बैस यांनी नंदुरबारच्या रावळापाणीचा उल्लेख करीत या भागातील आदिवासी क्रांतीविरांनी इंग्रजांचा निषेध केला होता. ज्यात गोळीबार होवून अनेक आदिवासी बांधव शहीद झालेत. त्यांना वंदन करत असल्याचे सांगीतले.

 

अक्ष्ाराने निरक्ष्ार पण अनुभवाने विद्वान बहिणाई

बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले आहे. त्यांना स्वत:ला शाळेत जाण्यासाठी संधी मिळाली नाही मात्र त्यांचे विचार, जीवनाचे तत्त्वज्ञान आणि त्यांच्या कवितांमुळे त्यांच्या लेखनावर अनेक पीएच.डी. झालेत. त्यावरून त्यांच्या विद्धतेची कल्पना येते अस्ाल्याचा उल्लेखही कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केला.  असे ते म्हणाले.