पंढरपूरवरुन येताना वारकऱ्यांवर काळाचा घाला ; जीप विहिरीत कोसळून ७ जण ठार, ६ जखमी

जालना । पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव काळ्या-पिवळ्या जीपचा आणि दूचाकीची धडक होऊन जीपच्या चालकाचे नियंत्रण चुकल्याने जीप थेट विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. यात सात भाविक ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जालना ते राजूर मार्गावर घडली. जखमींना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या जीपमध्ये एकूण 13 प्रवासी भाविक दाटीवाटीने बसले होते अशी माहिती उघडकीस आली आहे. नेगावचे काही भाविक पंढरपूर येथून बसने जालना येथे आले होते. जालना येथून काळी पिवळी जीप करुन ते राजूरकडे घरी जात होते.

याच दरम्यान, जालना ते राजूर मार्गावर तुपेवाडी शिवारात दुचाकी आणि काळी पिवळीचा हा अपघात झाला. यावेळी काळी पिवळी जीप दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्न करताना रोड लगत असलेल्या पाण्याने तु़डुंब भरलेल्या विहिरीत पडली आणि या अपघातात ७ भाविकांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. तर ६ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले असले तरी ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जालना येथे उपचारसाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना मोफत उपचार दिले जाणार जाणार आहेत.

अपघातात मृत झालेल्या वारकऱ्यांची नावं
प्रल्हाद बिटले- रा चनेगाव ता. बदनापूर.
प्रल्हाद महाजन -रा चनेगाव
नारायण निहाळ -रा चनेगाव
नंदा तायडे -रा चनेगाव
रंजना कांबळे -रा खामखेडा ता भोकरदन .
ताराबाई भगवान मालुसरे -रा तपोवन ता भोकरदन .
चंद्रकला अंबादास घुगे –रा चनेगाव ता बदनापूर.