---Advertisement---
जळगाव : पावसाच्या सततच्या रिपरिपने भाजीपाल्यावर झालेला विपरीत परिणाम, भाजीपाला पिकांवर पडलेली कीड, पाहिजे तसे न होणारे उत्पादन, कमी झालेली आवक, लागवडीचे क्षेत्रात झालेली घट, अशा विविध परिणामांमुळे खान्देशात भाजीपाल्याच्या दराने शंभरी गाठली. खान्देशातील अनेक बाजारपेठेत व परिसरात गावागावांमध्ये विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता, जी लागवड केली होती, ती पूर्णतः वाया गेली. काही प्रमाणात जी शिल्लक राहिली होती, त्यातही जूनमध्ये झालेल्या रिपरिप पावसाने भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड लागली. त्यामुळे परिसरातील भाजीपाला पिकाचे चक्रच पूर्णतः बंद पडले. याचा विपरीत परिणाम भाजीपाल्याचे वाढलेले दर, त्यात झालेली कमालीची वाढ, यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. मोजक्या शेतकऱ्यांचा राहिलेला भाजीपाला शेतकऱ्यांना सुखद धक्का देऊन जात आहे.
वांगी, मेथी, पोकळा, फ्लॉवर, भेंडी, कोथिंबीर, मिरची व इतर भाजीपाल्याच्या दराने प्रतिकिलोला शंभरी गाठली आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे भाजीपाला पिकांचे बजेट दरवाढीने पूर्णतः विस्कळित झाले आहे. सध्या सुरू झालेल्या शाळा पाल्यांना लागणारा डबा, सकाळी सुरू होणारी कटकट, त्यात भाजीसाठी होणारी वणवण यामुळे गृहिणींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दर आवाक्यात राहावेत !
भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य माणसांच्या खाण्यापिण्यावर, आर्थिक बजेटवर विपरीत परिणाम होत आहे, दर आवाक्यात राहावेत. शेतकऱ्यांनाही फायदा झालाच पाहिजे. मात्र, फक्त व्यापाऱ्यांचाच फायदा होत आहे, हेही तितकेच खरे. गृहिणींना मात्र यातून तारेवरची कसरत करावी लागत आहे.
– शीतल पाटील (गृहिणी, मेथी)