दुर्दैवी! जळगाव जिल्ह्यात दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, घटनेनं हळहळ

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यात दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता.धरणगाव) व मयूर किशोर काळे (वय ३०, रा. दापोरा, ता. जळगाव) असे मृत तरुणांचे नाव आहे. या घटनेमुळे भिल व काळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी पद्धतीने ‘वायरमन’ म्हणून काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाचा शॉक लागल्यानंतर इलेक्ट्रिक खांब्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. कामावर असताना झालेल्या या अपघातामुळे दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता.धरणगाव) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

दिलीप भिल धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये इलेक्ट्रिक खांबावर काम करण्यासाठी गेला होता. सकाळी ९ वाजता भिल खांबावर चढून काम करत असताना, अचानक तो जमिनीवर कोसळला. खांबावरून पडल्याने भिल याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप भिल याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच दिलीपच्या आई-वडील, पत्नी आणि नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली.

मृतदेह स्वीकारण्यास नकार, आज आंदोलन

मयत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आणि ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दिलीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. रात्री देखील जिल्हा रुग्णालयात नातेविकांनी मृतदेह स्वीकारला नाही. शुक्रवारी, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दापोरा येथील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव : दापोरा गावात गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असताना विजेचा धक्का लागून ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयूर किशोर काळे (वय ३०, रा. दापोरा, ता. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे.

तो आपल्या आई, वडील, भाऊ, पत्नी आणि एका मुलीसोबत मयूर हा शेतीची कामे करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत वास्तव्याला होता. गुरुवारी सकाळी १० वाजता मयूर हा बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला. शेजारील तरुणांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयूरला मृत घोषित केले. हे ऐकून त्याचे वडील आणि भावाने मोठा आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तरुण कर्त्या मुलाच्या अचानक जाण्यामुळे काळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---