---Advertisement---
जळगाव : सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल (वरुणावतार) यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत जळगाव शहरातील सिंधी समाज यांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले. बघेल यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे २६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित पंचशताब्दी संवाद कार्यक्रमात अमित बघेल यांनी भगवान झूलेलालांविषयी आक्षेपार्ह आणि सांप्रदायिक वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. हे वक्तव्य सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, देशभरातील सिंधी समाजात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक आस्थेचा अपमान करणारे असे वक्तव्य अमान्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमित बघेल यांनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावून समाजात सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुकाने बंद ठेवत नोंदविला निषेध
जळगाव शहरातील सिंधी समाज बांधवांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत, आपली दुकाने बंद ठेवत निषेध नोंदविला. या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. यावेळी सिंधी बांधवांनी बघेल यांच्या निषेधार्थ फलक झळकवत आंदोलन केले. सिंधी समाज बांधवांच्या या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गट देखील सहभागी झाला होता.









