---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर वाढला असून, हवामान विभागाने आगामी काळात जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. दरम्यान, या लाटेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी रात्री जळगाव शहराचे तापमान थेट ९ अंश सेल्सिअस इतके खाली घसरले. यंदाच्या हंगामातील ही सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे.
नोव्हेंबर महिन्यात थंडीची सुरुवात होते खरी, पण तापमान इतक्या कमी पातळीवर सहसा घसरत नाही. मात्र, यंदा अवकाळी पावसाची स्थिती संपल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात रात्रीच्या तापमानात चांगलीच घसरण झाली आहे.
जळगावमध्ये २०१४ नंतर पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात पारा ९ अंशांपर्यंत खाली आला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये ९.४ अंश आणि २०१४ मध्ये ९.१ अंशाची नोंद झाली होती.
नोव्हेंबर महिन्यातच एवढ्या कडाक्याची थंडी पडत असताना, डिसेंबर व जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका अजून वाढण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.









