---Advertisement---

Maharashtra politics News : उद्धव ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र? जाणून घ्या का होतेय चर्चा

---Advertisement---

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठे नाट्यमय बदल घडले आहेत. एकेकाळी २५ वर्षे सोबत राहिलेल्या शिवसेना-भाजप युतीत दुरावा आला, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे ठाकले. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि पक्ष दोन गटांत विभागला गेला. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा वारंवार रंगत असतात. असाच एक प्रसंग नुकताच पाहायला मिळाला. भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका लग्न समारंभात भेट झाली. या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात का, या चर्चांना उधाण आले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी आपल्याच शैलीत उत्तर देत चर्चांना फोल ठरवले.

“लग्नात भेटलो म्हणून युती होते का?” – फडणवीस यांचा टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांवर खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “लग्न समारंभात भेट होणे हे स्वाभाविक आहे. मी तिथे असतो तर माझीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असती. त्यात फार काही विशेष नाही. पहिली गोष्ट म्हणजे, लग्नात भेटल्याने पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार किमान तुमच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात येऊ नये, ही आमची अपेक्षा आहे.” त्यामुळे फडणवीस यांच्या या वक्तव्याने स्पष्ट झाले की, एका साध्या भेटीवरून युतीबाबत अंदाज बांधणे योग्य नाही.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे आपल्या कामाच्या निमित्ताने आले होते. मीही माझ्या कामासाठी आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. मात्र, सकाळी मंत्रिमंडळ बैठकीत आमची भेट झाली होती. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटणे ही काही चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात, मी त्यांना कधीही भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांनी आधीच अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यावर अधिक काही सांगण्याची गरज नाही.”

केंद्रीय अर्थसंकल्पावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भात झालेल्या बैठकीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत एक बैठक होते. त्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री उपस्थित असतात. आपल्या अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. त्यावर चर्चा झाली आहे.”

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---