Operation Sindoor: पाकिस्तानने भारताविरोधात नांगी टाकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूरचीच निवड का केली, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. पंतप्रधान मोदींच्या या भेटीत या एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ च नाही तर भारताचे सुरक्षा कवच ठरलेली रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० देखील जगाला दिसली. दिसली नाही तर मुद्दामहून दाखविण्यात आली. खोट्याची शेखी मिरविणाऱ्या पाकिस्तानची पार जिरविण्यासाठी पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक आदमपूरची निवड केली.
मोदींचा आदमपूरचा जो व्हिडीओ समोर आला आहे. त्यात या दोन्ही गोष्टी दिसत आहे. एस-४०० ने पाकिस्तानचे ड्रोन हल्लेच नाहीत तर क्षेपणास्त्र हल्लेही परतवून लावले होते. रशिया तेव्हा भारताच्या मदतीला आला नसता तर कदाचित भारताला या आधुनिक युद्धात लढणे कठीण गेले असते. रशिया हा भारताचा कायमच मित्र देश राहिला आहे. मित्रासाठी वाट्टेल ते म्हणत भारतानेही नेहमी रशियाला त्यांच्या चलनाचा दर कमी असूनही जास्त भाव दिला आहे.
पाकिस्तानने पंतप्रधान मोदींनी भेटीला गेलेला हवाई दलाचा तळ उद्ध्वस्त केल्याची शेखी मिरविण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानी लढाऊ दलाचे विमान जेएफ-१७ ने आदमपूर एअरबेससह तिथे तैनात असलेली एस-४०० देखील नष्ट
केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने यासाठी हायपरसोनिक मिसाईलचा वापर केला होता, असा दावा करण्यात आला होता. तो भारताने फोल ठरविला आहे. हाच नाही तर पाकिस्तानचे अन्य दावेही साफ खोटे ठरले आहेत.
काय होते दावे…
आदमपूरची धावपट्टी उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. परंतु, आज मोदींचे विमान याच धावपट्टीवर उतरले. म्हणजेच रनवे पूर्णपणे ठीक आहे, हा संदेश जगात गेला.
पाकिस्तानने ड्रोनने आदमपूरच्या रडार सिस्टमवर हल्ला केल्याचे म्हटले होते. ही रडार सिस्टीम यानंतरही देशाचे संरक्षण करीत होती, करीत आहे. म्हणजे हा हल्ला झालाच नाही.
क्षेपणास्त्रांनी भारतीय हवाई दलाचे विमान पाडले असा दावा पाकिस्तानने केला होता. यात या विमानतळावरील तैनात मिग २९ दिसत आहेत.
हवाई दलाचे अनेक जवान ठार मारल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र, सर्वच कर्मचारी सुरक्षित आहेत आणि सर्वजण लष्कराच्या रेकॉर्डवर आहेत. तसेच आज मोदींच्या स्वागतावेळी हे जवान आनंदोत्सव साजरा करत होते.
आदमपूर एअरबेसची उपग्रह छायाचित्रे दाखविताना पाकिस्तानने त्याला नुकसान झाल्याचे म्हटले होते. तज्ज्ञांनी याची पडताळणी केली तेव्हा त्यात छेडछाड केल्याचे आढळले. आदमपूर एअरबेस अनेक वर्षांपासून बंद होता, असेही पाकिस्तानने म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात तिथे तैनात असलेली यंत्रणा पाहता तो एक आघाडीचा एअरबेस असल्याचे जगाने पाहिले आहे.