सामरोद येथे शेतकऱ्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । जामनेर : तालुक्यातील सामरोद येथील शेतातून घराकडे कडबाकुट्टी घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉलीसह बांधावरील विहिरीत पडले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. सुपडू सुकदेव देसाई (६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

 

सुपडू देसाई हे आपल्या शेतातून घराकडे ट्रॅक्टरने कडबा नेत होते. ते स्वत: ट्रॅक्टर चालवित होते. वाटेतच त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत पडले. त्याखाली दबून सुपडू देसाई यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती समजताच सरपंच श्रीकांत पाटील व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने आधी ट्रॉली, हुड काढण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. हर्षल चांदा यांनी दिलेल्या माहितीवरून जामनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.