भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने केळी पीक उपटून फेकले; लाखोंचा खर्च गेला वाया

मुक्ताईनगर । गेल्या काही दिवसापासून वाढत्या तापमानामुळे केळी पिकाला फटका बसत आहे. यातच केळीला चांगला भाव मिळत नाहीय. या दुहेरी संकटामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. केळी पिकावर लावलेला खर्चही निघेनासा झाला आहे. यामुळे हताश झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्याने शेतातील केळी पीक जेसीबीच्या साहाय्याने उपटून फेकलं आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी सतीश चौधरी यांनी मानेगाव शिवारात असलेल्या दीड हजार खोड असलेली केळी बाग जेसीबीने उपटून फेकली आहे. यामुळे शेतकऱ्याने आतापर्यंत लावलेला खर्च वाया गेला आहे. सतीश चौधरी यांचे मानेगाव शिवारात शेत आहे. १५०० खोड लावून त्यांनी केळी बाग फुलविली. खते आणि न्यूट्रिएन्टवर मोठा खर्च केला.

परंतु केळी कापणीस आल्यावर व्यापारी ४०० ते ५०० रुपये दराने केळीची मागणी करीत आहेत. लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंतच्या खर्चावर कापणीचा व वाहतूक खर्च हा वरचढ ठरल्याने चौधरी यांनी थेट केळी बाग उपटून फेकली आहे. आता खरिपात कपाशी लागवड करण्याची तयारी सुरू केली आहे.