संभाजीनगर नंतर मुंबईत रामनवमीला दोन गटात हाणामारी

मुंबई : छत्रपती संभाजीनगर शहरात रामनवमीच्या पहिल्या दिवशी दोन गटांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनतर आता पुन्हा मुंबईत रामनवमीला दोन गटांमध्ये राडा झाला. या प्रकरणी २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री समाजकंटकांनी दगडफेकसह पोलिसांवर पेट्रोलने भरलेल्या बॉटल्स फेकल्याची घटना घडली. त्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत रामनवमीला दोन गटात राडा झाला. दरवर्षीप्रमाणे रामनवमीला मुंबईतील मालाड परिसरात हिंदू संघटनांकडून शोभा यात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक मालवणी परिसरातून जात असताना दोन गटात हाणामारी झाली.

या प्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण होती पण आता नियंत्रणात आहे. परिसरातील वातावरण धोक्यात आणल्याप्रकरणी 300 हून अधिक अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला. कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहितीही पोलिसांनी दिली

नेमकं प्रकरण काय?

रामनवमी निमित्ताने मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात बजरंग दलाकडून शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते. याच शोभायात्रेत मालवणी गेट क्रमांक पाच जवळ दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.

शोभा यात्रेदरम्यान काही लोकांकडून दगड फेक आणि चप्पल फेक करण्यात आली, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. सध्या मालवणी परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.